31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणराष्ट्रवादीचे मंथन होते की कुंथन?

राष्ट्रवादीचे मंथन होते की कुंथन?

शिबिरामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, मार्गदर्शन केलं जातं.

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिर्डीमध्ये विचार मंथन शिबीर पार पडले. ‘विचार मंथन:वेध भविष्याचा’ असं हे शिबीर, संकटात सापडलेला शेतकरी, कष्टकऱ्यांना आधार देण्यासाठी, राज्यापुढील आव्हानांचा वेध घेण्यासाठी हे शिबीर असणार असं जाहीर करण्यात आलं होत. सर्वसाधानपणे मंथन शिबीर हे अशाच प्रकारचं असतं.

शिबिरामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, मार्गदर्शन केलं जातं. पक्षबांधणी, निवडणूक कशी लढवावी, निवडणुकीची तयारी, पुढे काय काय आव्हान आहेत. राज्यात आपल्या पक्षाच्या आता किती जागा आहेत त्या वाढवण्यासाठी काय करावं लागेल असं सर्वसाधारण मार्गदर्शन म्हणजे पक्षाचं मंथन शिबीर असत. राष्ट्रवादीने वेध भविष्याचे असंच काहीस शिबिर असेल, अशी घोषणा केली होती. पण दोन दिवस चाललेल्या या शिबिरात भविष्याचा वेध घेण्यापेक्षा शिंदे फडणवीस सरकारचा, भाजपाचा, केंद्र सरकारचाच वेध घेतला जात असल्याचे दिसून आलं. पक्षाचे बडे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंथन शिबिरात भाषण केलं त्यांच्या भाषणात कुठेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाचं भाष्य दिसलं नाही.

शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळणार, केंद्र सरकारवर टीका, राज्याबाहेर प्रकल्प कसे गेले हेच पुन्हा पुन्हा मंथन शिबिरातही ऐकायला मिळालं. जयंत पाटलांनी शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असा दावा केला. त्यांच्या दाव्याला  अजित पवारांनीसुद्धा दुजोरा दिला. जयंत पाटील म्हणाले की, जेव्हा शिर्डीत कॉंग्रेसचं अधिवेशन झाले तेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचं अधिवेशन होतंय. याठिकाणी जेव्हा जेव्हा कुठल्या पक्षाचं अधिवेशन झाले तेव्हा त्यावेळचं सरकार कोसळलंय असा दावा त्यांनी केलाय. तर अजित पवार म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार तोपर्यंत चालणार जोवर त्यांच्याकडे १४५ चं बहुमत आहे. हा आकडा जसा जाईल राज्यातील सरकार कोसळेल असं म्हणत त्यांनी राजकीय अंदाज समोर ठेवले. छगन भुजबळ यांनी सुद्धा काही वेगळं केलं नाही. ईडी चौकशी, मग केंद्र सरकारवर टीका, ईडी कोणावर कशी लागते, महाराष्ट्राबाहेर कसे प्रकल्प गेले हाच पाढा त्यांनीसुद्धा मंथन शिबिरामध्ये वाचून दाखवला.

राष्ट्रवादीचे दोन दिवसीय शिबीर हे शिंदे सरकार, खोके सरकार टीका करण्यातच गेलं. म्हणजे मंथन शिबिरात जे काही मार्गदर्शन होतं ते झालंच नाही. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळासाठी हजेरी लावली होती. त्याच पाच मिनिटांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना असं वाटलं असेल की मंथन शिबीर आहे. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. राज्यात परिवर्तन करण्याची संधी आपल्याला मिळतेय. आता पूर्ण ताकदीने पक्ष मजबूत करा, असे आवाहन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केले. त्यावेळी बहुतेक कार्यकर्त्यांना वाटलं असेल की पक्षाचं मंथन वेध भविष्याचे शिबीर सुरु आहे. नाहीतर मग अजित पवार, जयंत पाटील असोत त्यांनी नेहमीप्रमाणे शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. ते जे पत्रकार परिषद घेऊन बोलतात तेच बोलले.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांची मुंबईमध्ये परिषद घेतली होती. त्यांनीसुद्धा गटप्रमुखांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. म्हणजे मेळावा असो, मंथन शिबीर असो की मग कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी परिषद याचं  समीकरण म्हणजे शिंदे फडणवीस सरकारवर टीका त्यांना खोके सरकार बोलणं हेच सुरु असते.

हे ही वाचा:

एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती

उत्तराखंड भूकंपाने हादरले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा जाणार गुवाहटीला

मागे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी झाली त्यातही कार्यकर्त्यांना मार्गदर्शनापेक्षा अशीच टीका ऐकायला मिळाली. त्या तुलनेत भाजपाच्या अशा कार्यकारिणीत किंवा चिंतन शिबिरात त्या विषयाला प्राधान्य दिले जाते, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला जातो, त्यांच्यापुढे एखादा कार्यक्रम ठेवला जातो. मात्र राष्ट्रवादीच्या शिबिरात पक्षाचा कार्यक्रम आहे, ज्यात पक्षाची दिशा ठरवणं कार्यकर्तांना मार्गदर्शन करायचं आहे, ते होणं अपेक्षित होत पण तस न होताच तोच टीकांचा पाढा राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरातसुद्धा वाचला गेला. आगामी काळात पालिकेच्या आणि दोन वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, पण त्यासाठी काय आखणी करता येईल याकडे लक्ष देण्यापेक्षा रोज भाजपावर, केंद्र सरकारवर टीका करण्याकडेच अधिक लक्ष दिले जातंय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा