मणिपूरमध्ये राजकीय उलथापालथ सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) पक्षाने बुधवार, २२ जानेवारी रोजी मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूरमध्ये सध्या मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेत आहे. मात्र, या राजकीय हालचालींमुळे मणिपूर सरकारला कोणताही धोका नसणार आहे.
मणिपूरमध्ये जेडीयूचे सहा आमदार निवडून आले होते. मात्र, या सहा पैकी पाच आमदारांनी यापूर्वीचं भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यात जे एक आमदार जेडीयूमध्ये होते, त्यांनी भाजपला दिलेला आपला पाठिंबा मागे घेतला आहे. त्यामुळे जरी मणिपूरमध्ये जेडीयूने भाजपचा पाठिंबा काढला असला तरी सरकारला कुठलाही धोका नाही, सरकार स्थिर आहे. आता हा एकमेव आमदार विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार आहे. जेडीयूचे आमदार यापूर्वीच भाजपमध्ये आल्याने सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही.
मणिपूरमध्ये २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने सहा जागांवर विजय मिळवला होता. त्यातील पाच आमदारांनी या आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर आता एका आमदारानं आपला पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूर विधानसभेची एकूण सदस्य संख्या ६० आहे. त्यामध्ये भाजपचे ३७ आमदार आहेत. जरी नितीश कुमार यांनी आपला पाठिंबा मागे घेतला असला तरी भाजपकडे पुरेस संख्याबळ असल्यामुळे सरकार स्थिर आहे.
हे ही वाचा..
केजरीवाल काँग्रेसच्या निशाण्यावर; ३८२ कोटींचा आरोग्याशी संबंधित घोटाळा केल्याचा आरोप
९ नवे जिल्हे रद्द केल्याबद्दल राजस्थानमध्ये आंदोलन
दावोसमधून पहिल्याचं दिवशी सहा लाख कोटींहून अधिकची विक्रमी गुंतवणूक
बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित!
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूरमधील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. कॉनराड संगमा यांच्या पक्षाने भाजपाच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचं कारण मणिपूर राज्यातील हिंसाचार असे सांगितले होते. नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर आता जनता दल यूनायटेडनेही मणिपूर सरकारचा पाठिंबा काढला आहे.