विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ९ नोव्हेंबर रोजी बॉम्ब टाकला. नवाब मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला. यानंतर आता राज्याचे राजकारण तापले असून भाजपा आमदार नितेश राणे यांनी या विषयावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आता खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ शुद्ध करण्याची गरज आहे असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
ट्विटर वर एक व्हिडीओ पोस्ट करत आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती असेल की ९३ च्या दंगलीनंतर हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं. मुंबईच्या हिंदूंना वाचवलं आणि त्यामुळे एक नवा इतिहास रचला गेला. इतक्या वर्षानंतर त्यांचाच मुलगा १९९३ च्या दंगलीमध्ये जे मुख्य आरोपी आहेत, त्यांचा जो बिझनेस पार्टनर मंत्री आहे त्यांच्याच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहे. आता खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याचाची वेळ आलेली आहे. हा समस्त हिंदूंचा अपमान आहे. शिवसैनिक आता स्मृती स्थळावर जाऊन गोमुत्र शिंपडणार का? ते जर करणार नसतील तर येणाऱ्या दिवसांमध्ये मीच हे कार्य करणार आहे” असे नितेश राणे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
रियाझ भाटी म्हणतो, मी राष्ट्रवादीचाच
आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार
एसटी कर्मचाऱ्यांप्रती राज्य सरकारला संवेदनाच नाहीत!
पंजाबमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांवर सिद्धू भारी
नितेश राणे यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर शिवसेनेतर्फे त्या समाधी स्थळावर गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण करण्यात आले होते. या घटनेवरूनच आता नितेश राणे यांनी शिवसेनेला उद्देशून हा सवाल केला आहे.