आपल्या अक्षेपार्ह लिखाणासाठी चर्चेत असणारी अभिनेत्री केतकी चितळे ही पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात केतकी चितळे हिने लिहिलेल्या फेसबुक पोस्टवरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे. या प्रकरणात किती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र प्रसिद्ध करत केतकी चितळेचा निषेध केला आहे.
कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये असं म्हणत राज ठाकरे यांनी या संपूर्ण पोस्टचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अशा लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
चारधामचे व्हीआयपी दर्शन आता बंद
सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा! आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर
ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण
“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”
काय आहे राज ठाकरे यांचे पत्र?
कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत…! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.
चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!
पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.
आपला नम्र,
राज ठाकरे