कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. मात्र, महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले होते. राज्याला ५० लाख कोविशिल्ड आणि ४० लाख कोव्हॅक्सिनची लसींची गरज असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. या मागणीवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचे सांगणारे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच लसींच्या तुटवड्यामुळे राज्याला लसीकरणाची गती वाढवणे शक्य होत नसल्याचे देखील या वृत्तात म्हटले आहे. मात्र, हे असे वृत्त चुकीचे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
महाराष्ट्रात १४ जानेवारी २०२२च्या अहवालानुसार कोवॅक्सिन या लसीच्या वापर न झालेल्या २४ लाखांपेक्षा जास्त मात्रा शिल्लक आहेत. त्याशिवाय ६.३५ लाख अतिरिक्त मात्रा प्राप्त झाल्या आहेत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. कोविनवरील साप्ताहिक वापराच्या आकडेवारीनुसार, १५ ते १७ वयोगटातील लाभार्थींना देण्यासाठी आणि खबरदारीची मात्रा देण्यासाठी महाराष्ट्राचा दैनंदिन सरासरी वापर २.९४ लाख मात्रा आहे. त्यामुळे राज्याकडे पात्र लाभार्थींना कोवॅक्सिन या लसीच्या मात्रा देण्यासाठी पुढील दहा दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
हे ही वाचा:
टीम इंडियाला साडेसाती; तिसरी कसोटीही दक्षिण आफ्रिकेने सात विकेट्सनी जिंकली
आठवी पास पठ्ठ्याने ३० हजारांत बनवली फोर्ड कार
भारत बायोटेकच्या संस्थापकांनी तिरुमला देवस्थानला दिली ‘ही’ देणगी
आता भारतीय ५९ देशांत करू शकणार व्हिसाशिवाय प्रवास
तसेच राज्याकडे कोविशील्ड या लसीच्या वापर न झालेल्या आणि शिल्लक असलेल्या सुमारे १.२४ कोटी मात्रा आहेत. दिवसाला सरासरी ३.५७ लाख मात्रांचा विचार केला तरी हा साठा लाभार्थींना लसी देण्यासाठी ३० दिवसांपेक्षाही जास्त दिवस पुरेसा ठरू शकतो, असे स्पष्टीकरण केंद्राने दिले आहे.