महाराष्ट्रातील जनतेने बरीच वर्षे राज ठाकरे यांच्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची प्रतिमा पाहीली. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर हिंदुत्वाची भगवी शाल, रुद्राक्ष माळा अभिमानाने मिरवली. हिंदुत्वाबाबत राज ठाकरेंचे कभी हा, कभी ना चाललेले असते. सध्या ते हिंदुत्वाकडे पाठ फिरवून विरुद्ध दिशेला धावताना दिसतायत.
भारतातील प्रत्येक राज्य हा एक देश होता. भारत १९४७ मध्ये निर्माण झाला, असे बेधडक वक्तव्य ठाकरेंनी एका मुलाखतीत केले आहे. हे त्यांच्या समर्थकांसाठी सुद्धा धक्कादायक आहे. कधी काळी डाव्या विचारवंतांनी हा सिद्धांत भारतीय जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रय़त्न केला. तो अपयशी ठरलाच, शिवाय डावे देशाच्या राजकारणातून पूर्णपणे अस्तंगत झाले. विष्णू पुराण द्वीतीय अंश, अध्याय ३, श्लोक १
उत्तरं यत्समुद्रस्य: हिमाद्रेश्र्चैव दक्षिणं वर्षं तद् भारतं नाम: भारती यत्र संतती
विष्णू पुराणाची रचना महर्षी व्यासांचे वडील ऋषी पराशर यांनी केली आहे. हा काळ साधारण द्वापार युगाच्या अखेरीस आणि कलियुगाच्या सुरुवातीचा मानला जातो. इसवीसन पूर्व ३१००.
हा काळ नेमका कोणता असावा याबाबत मतभेद असू शकतात. परंतु विचारवंताचा आव आणत राज ठाकरेंनी केलेले वक्तव्य म्हणजे निव्वळ बकवास आहे, हे यातून सिद्ध व्हावे. हा बाळासाहेबांचा विचार नक्कीच नाही.
कम्युनिस्टांनी हा विचार भारतात पेरण्याचा जोरदार प्रय़त्न केला. १९४० मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे सरचिटणीस पी.सी.जोशी यांनी ब्रिटीशांच्या क्रिप्स कमिशनला दिलेल्या निवेदनात असे म्हटले की, भारत एक राष्ट्र नसून अनेक राष्ट्रीयत्वांचे एक कुटुंब आहे.



