संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला. त्यांना संसदेत घुसायचे होते. पोलीस त्यांना रोखत होते. सीजेपीच्या एक्स हँडलवर टाकलेल्या एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे, ‘PM Modi tell your police to stand down, we are democracy in case you have forgotten.’ ही पोस्ट वाचल्यानंतर एक प्रश्न पडतोच, हे कोणत्या लोकशाहीच्या बाता करतायत? ती लोकशाही जी जनता जनार्दनाच्या पाठिंब्यावर संसदेत बसली आहे, की ती जी संसदेत घुसण्याचा प्रयत्न करत आहे? सलग तीन वेळा नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाले. अवार्ड वापसीपासून शेतकरी आंदोलनापर्यंत देशात सत्तापालट करण्याचे अनेक प्रयोग झाले. परदेशातून आलेल्या स्क्रिप्टसह ही टूलकिट भारतात राबवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा चिराही ढळला नाही. रोहित वेमुलापासून अकलाखपर्यंत अनेकांच्या मृतदेहावर विरोधकांनी राजकारण केले. तरीही लोक रस्त्यावर उतरले नाहीत. मोदींची लोकप्रियता कणाकणाने वाढत राहिली. ‘नीट’ पेपरफुटीमुळे मोदी सरकारच्या विरोधात आयते कोलीत विरोधकांच्या हाती लागले. विद्यार्थ्यांच्या भल्याचा आव आणत आंदोलन सुरू झाले खरे, परंतु आज ‘मोदी हटाव’ हा मूळ मनसुबा कॉक्रोच मंडळींनी उघडपणे बोलून दाखवलेला आहे.



