बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी मकोका अंतर्गत तुरुंगात आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, वकील बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. देशमुख कुटुंबीयांकडून आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सरकारी वकील म्हणून उज्वलनिकम यांच्या नियुक्तीची मागणी लावून धरली होती. अखेर ही मागणी सरकारने मान्य केली आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर वकील बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या आदेशाची प्रत एक्सवर शेअर करत याबाबत माहिती दिली.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. pic.twitter.com/CkHIgGNneF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2025
आपल्या सात मागण्यांसाठी मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा दुसरा दिवस असून ग्रामस्थांच्या सात मागण्यांपैकी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी मान्य करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे.
हे ही वाचा:
पवार साहेब तुम्ही तरी स्वाभिमानाच्या बाता करू नका
प्रयागराजमध्ये भरला ‘चहाचा महाकुंभ’
सभागृहातील गदारोळानंतर आतिशी यांच्यासह १२ आप आमदार निलंबित
नोकरी-जमीन घोटाळा प्रकरणी लालू यादव कुटुंबाला धक्का, न्यायालयाने बजावले समन्स!
“एक मागणी मान्य केली असून इतर मागण्याही मान्य कराव्यात अशी अपेक्षा आहे. न्याय मागण्यासाठी जे करणं शक्य आहे, ते करणार आहे. माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही,” अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी दिली आहे.
एसआयटी, सीआयडीच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल. कुठे उणिवा वाटत असतील तर मदत होईल. जी चौकशी सुरू आहे, त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो. लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, यासाठीही सरकारी वकिलांचा उपोयग होणार आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे.