K फॉर कलाम
गेल्या दशकभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली भारताच्या संरक्षण क्षमतेत लक्षणीय प्रगती करण्यात आली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर भारत एक प्रमुख लष्करी शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारतीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यानी भारताच्या संरक्षण क्षेत्रात केलेले योगदान या परिवर्तनातील महत्त्वाची प्रेरणा आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे आज भारत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात आत्मनिर्भर झाला आहे. त्यांच्या या महान कार्याचे स्मरण म्हणून K क्षेपणास्त्र मालिकेचे नाव डॉ. कलाम यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे.
क्षेपणास्त्र एक लक्ष्ये अनेक !
K-6 मध्ये MIRV (Multiple Independently Targetable Re-entry Vehicle) तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्रातून अनेक स्वतंत्र वॉरहेड्स वेगवेगळ्या टार्गेटवर अचूक मार करू शकतात. ही क्षमता भारताच्या रणनीतीला बहुआयामी रूप देणारी ठरणार आहे. K-6 क्षेपणास्त्र १२ मीटर पेक्षा जास्त लांब आणि २ मीटर पेक्षा जास्त रुंद आहे. हे क्षेपणास्त्र आण्विक व पारंपरिक दोन्ही प्रकारचे वॉरहेड्स वाहून नेण्यास सक्षम असून, विविध प्रकारच्या युद्धप्रसंगांसाठी ते वापरता येऊ शकते. सध्या भारताकडे असलेल्या K-4 (३,५०० किमी मारा) आणि K-5 (६,०० किमी मारा) या सबमरीन-लाँच बॅलेस्टीक मिसाईल्सची ही पुढची पायरी आहे.K-6 क्षेपणास्त्रामुळे भारताची न्यूक्लिअर ट्रायाड (Triad) आणखी बळकट होणार असून, थलसेना, वायुदल आणि नौदल या तिन्ही मार्गांनी आण्विक प्रत्युत्तर देण्याची भारताची क्षमता वृद्धिंगत होणार आहे.
हिंदी महासागरात भारताचा वाढता प्रभाव
भारतीय नौदलासाठी हे क्षेपणास्त्र अत्यंत उपयुक्त ठरले आहे. हिंद महासागर क्षेत्रातून होणाऱ्या ८० % तेल व्यापाराच्या सुरक्षिततेसाठी याचा मोठा उपयोग होईल. चीन आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही घुसखोरीला उत्तर देण्यासाठी हे शस्त्र काही सेकंदांत शत्रूच्या जहाजांना नष्ट करण्याची क्षमता ठेवते.
हे ही वाचा:
‘सितारे जमीन पर’ चित्रपट पाहून फडणवीसांनी केले अमीर खानचे कौतुक
राज-उद्धव युती वर काँग्रेसची फुली !
फडताळातील सांगाडे दाखवून किती काळ घाबरवणार ?
”…तर उद्धव ठाकरेंचे अस्तित्व राहणार नाही”
जगातील बहुतेक हवाई संरक्षण प्रणाली या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा मागोवा घेण्यात अपयशी ठरतात. कारण हे शस्त्र प्रक्षेपणानंतर वेग, दिशा आणि मार्ग बदलण्यास सक्षम आहे. या प्रणालीत स्क्रॅमजेट इंजिनचा वापर केला जातो, ज्यामुळे या शस्त्रांना स्थिरता, वेग, आणि उंची मिळते. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या विकासामुळे भारताचा संरक्षण विभाग अधिक शक्तिशाली झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताने जागतिक पातळीवर स्वतःची सुरक्षा आणि सामर्थ्याची सिद्धता केली आहे.
राष्ट्राच्या सुरक्षेसाठी इतरांवर अवलंबून राहता येत नाही.भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि आर्थिक प्रगतीचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संरक्षण करण्यासाठी प्रबळ सैन्यव्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर आपल्याला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. भारताने गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर नव्याने उदयास येत असलेल्या बहुध्रुवीय सत्तेमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. याच गतीने जर आपला सैन्यविकास सुरू राहिला तर, स्वातंत्र्याच्या शतकी वर्षापर्यंत भारतीय सेना जगातील सगळ्यात शक्तिशाली सेना म्हणून आणि भारत “विश्वगुरू” म्हणून नक्कीच उदयास येऊ शकेल.
नुकताच भारत ४ ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाला आहे. दहा वर्षांपूर्वी लष्करी साहित्य आयात करणारा देश लष्करी साहित्य निर्यात करणाऱ्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
एकीकडे वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेले रशिया-युक्रेन युद्ध आणि दुसऱ्या बाजूला इस्राईल-इराण युद्ध यामुळे संपूर्ण जग चिंतातूर आहे. अशा परिस्थितीत भारत मात्र आपल्या “स्व” चे जागरण करून प्रगतीच्या,विकासाच्या,उन्नतीच्या म्हणजेच विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर गुलामगिरीची मरगळ झटकून वेगाने घोडदौड करीत आहे.
