भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी गुरुवारी (८ मे) पाकिस्तानबद्दलचे सत्य जगासमोर आणले. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आणि माजी परराष्ट्रमंत्र्यांनी उघडपणे कबूल केले आहे की त्यांचे दहशतवादी गटांशी संबंध आहेत. पाकिस्तान हा दहशतवादाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि हे सिद्ध झाले आहे की पाकिस्तान दहशतवादी गटांना पाठिंबा देतो आणि त्यांच्याविरुद्ध कधीही ठोस कारवाई करत नाही, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटले.
परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, भारताने कोणतीही चिथावणीखोर कारवाई केलेली नाही. आम्ही केलेली कारवाई ही २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केली आहे आणि आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
यावेळी त्यांनी पाकिस्तानला कडक इशारा देखील दिला. ते म्हणाले, ही वाढ पाकिस्तानने सुरू केली होती. आम्ही त्यावर प्रतिक्रिया दिली. आम्ही दहशतवाद्यांच्या छावणीवर हल्ला केला. पाकिस्तानने याला पुढे नेले तर भारत त्याला प्रत्युत्तर देत आहे आणि देत राहील. जर पाकिस्तानने भारतावर असा कोणताही हल्ला केला तर तो स्वतः त्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार असेल. तसेच पीओकेमध्ये असलेल्या नीलम झेलम प्रकल्पावर हल्ला केला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करण्याच्या पाकिस्तानच्या मागणीला उत्तर देताना परराष्ट्र सचिवांनी सांगितले, भारताने यापूर्वी पाकिस्तानला अनेक दहशतवादी हल्ल्यांचे पुरावे दिले होते परंतु त्यांनी कोणत्याही हल्ल्याच्या चौकशीत सहकार्य केले नाही. यावेळी त्यांनी पठाणकोट हल्ल्याचे उदाहरणही दिले. ते म्हणाले, भारताने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल पाकिस्तानला ठोस पुरावे दिले होते, परंतु पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांचा बचाव केला.
पाकिस्तानने आरोप केला की भारताने धार्मिक स्थळांना लक्ष्य केले, परंतु विक्रम मिस्री यांनी ते फेटाळून लावले आणि म्हटले की, भारताने फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले. मात्र, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील गुरुद्वारांना लक्ष्य केल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
राफेलला लिंबू-मिरची लावून सैन्याची खिल्ली उडवणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा दाखल!
“आमच्या संयमाची परीक्षा घ्याल तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल”
एकाच वेळी, पाककडून जयशंकर, डोवाल यांचे फूट मसाज आणि युद्धखोरी…
यासोबतच, मिस्री यांनी सांगितले की जेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ चे (TRF) नाव समाविष्ट करण्याची वेळ आली तेव्हा फक्त पाकिस्ताननेच त्याला विरोध केला आणि त्याचे नाव काढून टाकले. हे स्पष्ट संकेत आहे की पाकिस्तान अजूनही या दहशतवादी गटांना पाठिंबा आणि आश्रय देत आहे. बुधवारी (७ मे) रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांचा उद्देश भारतीय शहरांना लक्ष्य करणे होता, परंतु भारताने हे हल्ले हाणून पाडले, असे परराष्ट्र सचिव मिस्री यांनी सांगितले.
भारताच्या कारवाईत मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीमध्ये पाकच्या लष्करातील अधिकारी देखील उपस्थित असल्याचे समोर आले होते. याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये पाकच्या लष्करातील जवानांसह अधिकारी देखील उपस्थित होते. परराष्ट्र सचिव मिस्त्री यांनी याचे फोटो दाखवत विचित्र असल्याचे म्हटले.