भारताने पाकिस्तानला ७ मे रोजी पहाटे १ वाजून पाच मिनिटांनी जोरदार तडाखा दिला. तरीही पाकिस्तानची खाज पूर्णपणे मिटलेली दिसत नाही. एका बाजूला पाकिस्तानचे नामधारी पंतप्रधान शाहबाज शरीफ युद्धखोर विधाने करीत आहेत. पूंछ सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या तोफांच्या माऱ्यात १२ भारतीय नागरिक ठार तर ५० पेक्षा जास्त जखमी झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला मागील दाराने पाकिस्तानने परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे फूट मसाज सुरू केलेले आहे. पाकिस्तानमध्येही धमाके सुरू केले आहेत. ऑपरेशन सिंदूर २.० कधी सुरू होणार हा, प्रश्न सध्या अप्रस्तुत आहे, कारण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट सांगितले आहे, की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे.
सौदीचे परराष्ट्र मंत्री अदिल अल जुबेर अचानक भारतात येऊन थडकले. त्यांचा हा दौरा पूर्व नियोजित नव्हता. त्यापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास अरागची यांनी नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. दोन इस्लामी देशांचे परराष्ट्र मंत्री भारतात येतात आणि आपल्या परराष्ट्रांना भेटतात, त्याचा अर्थ उघड आहे. पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला ठोकण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. त्यानंतर हडबडलेल्या पाकिस्तानने इस्लामी राष्ट्रांच्या मिनतवाऱ्या सुरू केल्या. मोदींना समजवा, पाकिस्तानला वाचवा, असा घोषा लावला, जगभरातील नेत्यांचे पाय धरायला सुरूवात केली. सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचे भारतात आगमन त्याच पार्श्वभूमीवर झालेले आहे. दरम्यान, दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्येही बोलणे झाले आहे. अजित डोवाल आणि असीम मुनीर यांचे बोलणे झाल्याची माहिती पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनीच एका मुलाखतीत उघड केली. दार काहीही म्हणत असले तरी या चर्चेसाठी त्यांच्याकडूनच पुढाकार घेण्यात आला असेल हे नक्की. भारताला पाकिस्तानशी बोलण्याची या क्षणी तरी गरज नाही.
भारताचा संताप शांत व्हावा म्हणून पाकिस्तानकडून हा द्राविडी प्राणायम सुरू असताना, पंतप्रधान शाहबाज शरीफ मात्र युद्धखोरीची भाषा बोलतायत. त्यांची अडचण अशी आहे की हे युद्ध ज्यांच्या आगाऊपणामुळे पेटले ते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसीफ मुनीर काडी करून गायब झाले आहेत. त्यांचे दर्शन होत नाही, ते कुठे आहेत, काय करतायत, कोणालाच पत्ता नाही.
दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे जनाजे उठतायत. मातम का माहोल आहे. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळे मीडियाला सामोरे जाण्याची, जनमानसामध्ये निर्माण झालेला संताप झेलण्याची जबाबदारी शरीफ यांच्यावर येऊन पडलेली आहे. ‘तुम्ही आधी भारताला चिथावणी दिलीत, भारताने पाकिस्तानला ठोकून काढले, झेपत नसताना तुम्ही भारताला अंगावर का घेतले? असा सवाल पाकिस्तानची जनता करते आहे. मोठ्या मोठ्या बाता करून अखेर मार खाल्लात ना? असा जनतेचा सूर आहे. थापा मारून जनतेला शांत करण्याचे दिवस सोशल मीडियामुळे राहीले नाहीत. परंतु पाकिस्तानी नेते पोकळ प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेताना दिसतायत.
‘भारताची पाच लढाऊ विमाने आम्ही पाडली, त्यात तीन राफेल विमानांचा समावेश आहे’, असा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत केला. ‘तुमच्या या दाव्याला आधार काय? असा सवाल करताच, ते उत्तरले की, ‘भारतातील अनेकांनी सोशल मीडियावर हा दावा केलेला आहे.’ भारताच्या सोशल मीडियात काय चर्चा आहे, त्या आधारावर पाकिस्तानचे नेते पतंग उडवतायत आणि देशाची खिल्ली उडवून घेतायत. भारताची १२ ड्रोन पाडल्याच्या बातम्याही पाकिस्तानात पसरवण्यात आल्या आहेत. हा अप्रचार आपल्याला वाचवेल, अशी त्यांची भाबडी आशा आहे. भारताने जे केले त्याचे पुरावे, पाकिस्तानी मीडिया लाईव्ह कव्हरेच करून देतो आहे. पाकिस्तानने भारताचे काय नुकसान केले, हे सांगण्यासाठी पाकिस्तानचा ख्वाजा भारतातील अपरिचित सोशल मीडियाचे दाखले देतो आहे.
भारताच्या हल्ल्यानंतर शरीफ यांनी अफलातून अभिनय करणे भाग आहे. त्यांनी भारताला इशारा दिला आहे. ‘भारताची कृती युद्धखोरीची आहे, आम्ही याचे चोख उत्तर देऊ, शत्रूचा मुकाबला कसा करायचा हे पाकिस्तानी लष्कराला चांगले ठाऊक आहे, असे शरीफ म्हणाले आहेत.’ शऱीफ यांच्या विधानाचा अर्थ स्पष्ट आहे. पाकिस्तानची खुमखुमी सरलेली नाही. सापाला जखमी करून जिवंत सोडण्याचे परीणाम यापूर्वी भारताने भोगलेले आहेत. ही फणा चिरडण्याची वेळ आहे, असे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करतायत. दरम्यान, बलोचिस्तानात धमाके सुरू आहेत. लाहोरमध्ये आज एका पाठोपाठ असे तीन महाभयंकर स्फोट झाले. लाहोरच्या वॉल्टन रोडवरील अत्यंत उच्चभ्रू गुलबर्ग भागात हे स्फोट झाल्याचे वृत्त एआरवाय या वृत्तसंस्थेने दिले असून लाहोर पोलिसांनी याची पुष्ठी केली आहे. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर सगळे काही संपले आहे, असे म्हणण्याजोगी परीस्थिती निश्चितपणे नाही. जम्मूच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या तोफांच्या भडीमारात १५ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक लहान मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यात एक गुरुद्वारा जमीनदोस्त झाल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने काही क्षेपणास्त्रे सुद्धा सोडण्यात आल्याचे वृत्त आहे.
या साहसवादामुळे भारताला पाकिस्तानला उत्तर देणे भाग आहे. ते दिले जाईल, हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानातून स्पष्ट आहे. ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही, हे विधान बोलके आहे.
हे ही वाचा..
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचा शेअर बाजार ढासळला
सेनाप्रमुखांनी लान्स नायक दिनेश कुमार यांच्या शौर्याला दिली सलामी
पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला केले ठार
“कसोटी सिंहासन रिकामं – गिल की बुमराह?”
७ मे रोजी भारताने केवळ २५ मिनिटे कारवाई करून काही दहशतवादी मारले, काही अड्डे उद्ध्वस्त केले. पुढे बरेच काही बाकी आहे, ते करण्याची संधी पाकिस्तानी तोफ गोळ्यांचा भडीमार आणि पाकिस्तानी पंतप्रधानांची बकवास भारताला निश्चितपणे देणार आहे. पाकिस्तानलाही हे ठाऊक आहे. म्हणून कराची, सियालकोट, लाहोर विमानतळासह महत्वाच्या विमानतळांवर सगळी उड्डाणे रद्द करण्यात आलेली आहेत. भारताच्या हवाई हल्ल्याची भीती पाकिस्तानला सतावते आहे. येत्या काळात ही भीती अधिक गडद होणार आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)