जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यास भारताने सुरुवात केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ लागू करत भारताने पिओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले आणि या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे प्रमुख कमांडर ठार झाले. भारताची पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच असताना परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराची आज (८ मे) संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याची आणि त्यावर भारताने केलेल्या कारवाईची माहिती दिली.
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या लक्ष्यित हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ७-८ मे च्या रात्री उत्तर आणि पश्चिम भारतातील काही लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अवंतीपूरा, पठाणकोट, जालंधर, भटिंडा, फालोदी, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, चंदिगढ, उत्तरलाय, जम्मू, कपूरतळा, आदमपूर, नाल आणि भूज अशा भारतीय लष्कराच्या १५ ठिकाणांवर पाकने हल्ला केल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने ते हाणून पाडले.
हे ही वाचा :
भारताने बगलिहार धरणाचे दरवाजे उघडले!
एकाच वेळी, पाककडून जयशंकर, डोवाल यांचे फूट मसाज आणि युद्धखोरी…
‘ऑपरेशन सिंदूर’: शहर सोडा किंवा सुरक्षित ठिकाणी जा!
भारताचे S-400 अर्थात ‘सुदर्शन चक्र’ कसे पाकिस्तानसाठी ठरले मारक
कर्नल सोफिया म्हणाल्या, भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी किंवा नागरी तळांना लक्ष्य केले नाही. तर दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लष्करी कारवाई करण्यात आली. आज सकाळी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि रडार प्रणालीला लक्ष्य करून हल्ला केला. लाहोरमधील पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली.
पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर कोणत्याही कारणाशिवाय मोर्टार आणि तोफखान्यांचा वापर करून जोरदार गोळीबार केला जात आहे. यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे, असे कर्नल सोफिया यांनी सांगितले.