लालबाग भागात ६० मजली इमारतीला लागलेल्या आगीत १९व्या मजल्यावर आग लागल्याचे पाहायला गेलेला सुरक्षा रक्षक आपले प्राण गमावून बसला.
अरुण तिवारी नावाचा हा सुरक्षा रक्षक १९ व्या मजल्यावर आग लागल्यानंतर त्याठिकाणी पोहोचला पण नंतर त्याला लक्षात आले की, या आगीच्या तडाख्यात आपण सापडलो आहोत. तेव्हा त्याने पळण्याचा प्रयत्न केला आणि तो गॅलरीजवळ आला. तिथून उतरून तो स्वतःला वाचविणार होता. मात्र तसे करताना तो १९व्या मजल्यावरून खाली कोसळला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तो मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
अविघ्न पार्क ही आलिशान अशी बहुमजली इमारत लालबाग परिसरात आहे. सकाळी चौथ्या लेव्हलची आग लागल्याचा संदेश अग्निशमन दलाला मिळाला. त्यानंतर तब्बल १४ अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्या आणि त्यांनी दोन तासांत आग आटोक्यात आणली. ही आग वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचली होती. मात्र सुदैवान इमारतीतील रहिवाशांना त्वरित खाली आणण्यात आले होते.
पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले होते की, ११.५५ ला इमारतीला आग लागल्याचे कळल्यावर अग्निशमन दलाने ताबडतोब कारवाई सुरू केली. या आगीचे कारण काय हे तपासण्यात येत आहे. त्यात कोण दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल.
हे ही वाचा:
काय चाललंय पुण्यात? बँक लुटीनंतर आता गँगवॉर
राहुलजी, १०० कोटी लशी आल्या, लोकांनी घेतल्यासुद्धा!
बिल गेट्स का पडले मोदी आणि भारतीय लसीकरण मोहिमेच्या प्रेमात?
अविघ्न पार्क आगीवरून पेटला वाद! नेमके दोषी कोण?
या इमारतीत असलेली वॉटर सिस्टीम वर्कींगमध्ये नव्हती असा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी या आगीसंदर्भात केला आहे. तर प्रत्येकवेळी महापालिकेला दोष देऊन कसा चालेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इमारतीत सगळ्या सिस्टीम आहेत, पण त्या काम करत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात प्रथमदर्शनी तरी सोसायटीचे जे काही व्यवस्थापन आहे तेच दोषी असल्याचे दिसत आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.