ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भारत सरकारने ७ शिष्टमंडळे स्थापन केली आहेत. या शिष्टमंडळात काँग्रेस, राष्ट्रवादी-सपा, द्रमुक या विरोधी पक्षांच्या नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांचाही नावाचा समावेश केल्याचे समोर आले आहे. मात्र, पक्षाने आपल्या खासदाराला या शिष्टमंडळातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, परराष्ट्र धोरण हे केंद्र सरकारचे काम आहे आणि म्हणूनच त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारवरच असली पाहिजे.
ऑपरेशन सिंदूरवरील सर्वपक्षीय शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण सामील होणार नाहीत. ही माहिती टीएमसीने दिली आहे. पक्षाने म्हटले की, देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही पावलात केंद्र सरकारला पूर्ण सहकार्य करू. आमच्या सैनिकांचा देशाला अभिमान आहे आणि आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू. परराष्ट्र धोरण पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. म्हणूनच, आमचे परराष्ट्र धोरण ठरवण्याची आणि त्याची संपूर्ण जबाबदारी घेण्याची परवानगी फक्त केंद्र सरकारलाच दिली पाहिजे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सरकारने पठाणशी थेट संपर्क साधला होता. मात्र, यासाठी सध्या उपलब्ध नसल्याचे खासदाराने सांगितले.
यावर प्रतिक्रिया देताना टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहोत की दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही केंद्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर उघड करायला हवे, पण माझ्या पक्षातून कोण जाणार आणि विरोधी पक्षातून कोण जाणार हे पक्ष ठरवेल. भाजपा ठरवणार नाही.
हे ही वाचा :
“पाकने सुवर्ण मंदिरावर डागली होती क्षेपणास्त्र, पण…” काय म्हणाले लष्कर अधिकारी?
जम्मू- काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक
हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळला; आयसिसशी संबंधित दोघांना अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील व्यावसायिकाला अटक
दरम्यान, केंद्र सरकारने नुकतीच ५९ सदस्यीय शिष्टमंडळाची घोषणा केली होती. यामध्ये ५१ नेते आणि ८ राजदूतांचा समावेश आहे. तर एनडीएचे ३१ आणि इतर पक्षांचे २० आहेत, ज्यामध्ये ३ काँग्रेस नेते आहेत. या शिष्टमंडळाची ७ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात एका खासदाराला नेता बनवण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसचे शशी थरूर, भाजपचे रविशंकर प्रसाद, जेडीयूचे संजय कुमार झा, भाजपचे बैजयंत पांडा, डीएमकेच्या कनिमोळी करुणानिधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.
