जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव आहे. यापूर्वी केंद्र सरकारनेही पहलगाम हल्ल्याबद्दल बोलताना सर्वपक्षीय बैठकीत सुरक्षेत त्रुटी राहिल्याचे म्हटले होते, असे वृत्त होते. अशातच पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना एक गुप्तचर अहवाल पाठवण्यात आला होता आणि त्या अहवालानंतर त्यांनी त्यांचा काश्मीर दौरा रद्द केला.
झारखंडमधील रांची येथे संविधान वाचवा रॅलीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलताना हा दावा केला. पहलगाम हल्ल्याला गुप्तचर यंत्रणेचे अपयश त्यांनी म्हटले. हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक गुप्तचर अहवाल पाठवण्यात आला होता आणि त्या अहवालानंतर त्यांनी त्यांचा काश्मीर दौरा रद्द केला. पुढे ते म्हणाले की, “सरकारने हे अपयश मान्य केले आहे आणि ते त्यात सुधारणा करतील. जर त्यांना हे माहित होते तर त्यांनी काहीही का केले नाही? हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना एक गुप्तचर अहवाल पाठवण्यात आला होता आणि म्हणूनच त्यांनी काश्मीरला भेट देण्याचा त्यांचा कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती मला मिळाली आहे. मी हे एका वर्तमानपत्रातही वाचले,” असा दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यात गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे सरकारने मान्य केले आहे, असेही खरगे म्हणाले. याबद्दल माहिती असताना चांगल्या व्यवस्था का केल्या गेल्या नाहीत? असा सवालही खरगे यांनी उपस्थित केला. पाकिस्तानविरुद्धच्या कोणत्याही कारवाईसाठी काँग्रेस सरकारच्या पाठीशी उभी आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. “पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही कारवाईसाठी काँग्रेस सरकारच्या पाठीशी उभी आहे. देश सर्वोच्च आहे,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा :
पहलगाम हल्ल्यासाठी सपा नेते पाकिस्तानला क्लीन चिट देतायेत!
आवडले म्हणून बापन शेखने बायकोचे नाकच चावून गिळले
पुंछमध्ये दरीत बस कोसळून २ ठार, ४० जखमी
पहलगाम हल्ल्यानंतर २४ एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सरकारनेही सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली होती. सर्पपक्षीय नेत्यांच्या बैठकीत विरोधकांनी सुरक्षेसंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की, अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरण पर्वतातील कुरण पर्यटकांसाठी खुले केले आहे, ही माहिती पहलगाम स्थानिक प्रशासनाने सुरक्षा यंत्रणांना दिली नव्हती. जूनमधील अमरनाथ यात्रा होईपर्यंत हे कुरण बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले होते.