गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शनिवारी पार पडलेला ‘टेक्नो नाईन टाईम्स नाईन’ म्युझिक कॉन्सर्ट वादाच्या भीषण भोवऱ्यात सापडला आहे. या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन तरुण एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या इटालियन बँडवर टेक्नो डिजे तातडीने कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे. या परदेशी बँडच्या सदस्यांना सदर घटनेची पुर्व कल्पना होती याची चौकशी व्हावी तसेच त्यांना देशाच्या बाहेर जाण्यासाठी कोणी सेफ पॅसेज करुन दिला असेल तर त्यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्याचे प्रमुख संघटक मिलिंद तुकाराम घाग यांनी अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग), कांदिवली पूर्व, मुंबई यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.
घाग यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये हजारो तरुण सहभागी होत असतात. त्यामुळे आयोजकांनी सुरक्षा आणि तपासणीची काटेकोर व्यवस्था ठेवणे अत्यावश्यक असते. मात्र नेस्को येथील कार्यक्रमात अंमली पदार्थांची तस्करी व सेवन रोखण्यात आयोजक अपयशी ठरल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित आयोजक संस्थेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, कार्यक्रमाशी संबंधित टेक्नो ग्रुप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही या प्रकरणाची पूर्वकल्पना असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व संबंधितांवर सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, घटना घडल्यानंतर काही संबंधितांनी देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यामागील व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
जैशची महिला शाखा देशात सक्रीय आहे का?
दिल्ली विमानतळावर स्पाइसजेट आणि आकासा एअर विमानांच्या पंखाची ऐकमेकांना धडक
आरक्षणातून महिलांना काहीतरी देत आहोत हा भ्रम नको; तो त्यांचा हक्क!
लैंगिक शोषणाच्या प्रकरणानंतर टीसीएस नाशिक बीपीओचे कामकाज बंद!
या प्रकरणात ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या साखळीचा (ड्रग पेडलर्स) मुळापासून तपास करून त्यांचा नायनाट करणे आवश्यक असल्याचेही घाग यांनी नमूद केले आहे. विद्यार्थ्यांना लक्ष्य करून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या जाळ्यांवर कठोर कारवाई केल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, भविष्यात मुंबई आणि उपनगरांमध्ये होणाऱ्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पोलिसांनी परवानगी देताना कडक ‘अंमली पदार्थ प्रतिबंधक’ नियमावली लागू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी सीसीटीव्ही यंत्रणा, तपासणी व्यवस्था आणि साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवण्यावरही त्यांनी भर दिला आहे.
तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या घटनेमुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकूणच, या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची मागणी जोर धरत आहे.







