नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत गेल्या ३० वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी कुटुंबातील तीन सदस्यांना अटक केली आहे. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी, मानव तस्करी विरोधी सेलच्या (AHTC) अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील वाशीमधील जुहूगाव येथील एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या शारो अब्ताब शेख (वय ४८ वर्षे) आणि त्याची पत्नी सलमा सारो शेख (वय ३९ वर्षे) यांना बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या मोहिमेदरम्यान अटक केली होती. यावेळी त्यांची कागदपत्रे तपासण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने त्यांच्या फ्लॅटच्या मालकीची कागदपत्रे, आधार आणि पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड आणि पश्चिम बंगालमधील जयनगर येथील ग्रामीण रुग्णालयाने जारी केलेल्या जन्म प्रमाणपत्रांच्या फोटो प्रती सादर केल्या. कागदपत्रे दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. पुढे पोलिसांनी या कागदपत्रांची पडताळणी केली. जन्म प्रमाणपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी एएचटीसीची एक टीम २ फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालमधील ग्रामीण रुग्णालयात गेली. तेव्हा तपासणीनंतर, दक्षिण २४ परगणा येथील आरोग्य मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नवी मुंबई पोलिसांना कळवले की या जोडप्याने सादर केलेले जन्म प्रमाणपत्र बनावट आहे. तसेच, एका गुप्तचर सूत्राने पोलिसांना या जोडप्याचे राष्ट्रीयत्व कार्ड पाठवले होते, ज्यामध्ये ते बांगलादेशचे असल्याचे म्हटले होते. अखेर पोलिसांनी या जोडप्याला आणि भारतात जन्मलेल्या त्यांच्या २२ वर्षीय मुलाला अटक केली.
हे ही वाचा :
नोकरीची संधी देत टेस्लाकडून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
कॅनडातील टोरंटो विमानतळावर विमान उलटले; १८ प्रवासी जखमी
ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
युवा लेखक म्हणून विवान कारुळकरला वर्ल्ड रेकॉर्ड्स विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट
सुरक्षा कर्मचाऱ्यांचे लक्ष चुकवून हे जोडपे बोगना सीमा चेकपोस्टवरून देशात घुसले होते. त्यांनी भारतात बेकायदेशीरपणे सर्व ओळखपत्रे मिळवली आणि पुढे ते इथेच राहू लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ३१८ (४) (व्यक्तिरूपाने फसवणूक करणे आणि फसवणूक करणे), ३३६ (२) (बनावट करणे), ३३८ (मौल्यवान सुरक्षिततेची बनावट, मृत्युपत्र) आणि ३४० (१) (बनावट कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करणे आणि ते खरे म्हणून वापरणे) तसेच पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यातील तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.