भारताने बुधवार, ७ मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून ते उध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून याचा परिणाम पाकिस्तान शेअर बाजारावरही दिसून आला आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंधू’ नंतर पाकिस्तानी बाजारपेठ कोसळली असून बाजारात घबराटीचे वातावरण आहे. पाकिस्तानी शेअर बाजारात ६००० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली आहे.
बुधवारी झालेल्या भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंज निर्देशांकात मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाले. मंगळवारी एक दिवस आधी कराची स्टॉक एक्सचेंज ११३५६८.५१ अंकांवर बंद झाला होता. यानंतर बुधवारी, ६००० पेक्षा जास्त अंकांनी घसरून १०७२९६.६४ वर उघडला. म्हणजेच ५.५२ टक्के घट झाली.
जम्मू- काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्या दिवशी केएसई- १०० निर्देशांक ११८४३०.३५ अंकांवर बंद झाला. तेव्हापासून, केएसई-१०० निर्देशांक ९.४० टक्क्यांनी घसरला आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला तेव्हापासून सावरण्याची संधी मिळाली नसून पाकिस्तानच्या शेअर बाजाराला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी पाकिस्तानी बाजारात घसरण होण्यापूर्वी, ३० एप्रिल रोजी पाकिस्तानी शेअर बाजारही कोसळला होता. त्या दिवशी केएसइ- १०० निर्देशांक ३.०९ टक्क्यांनी घसरला. LUCK, ENGROH, UBL, PPL आणि FFC सारख्या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते.
हे ही वाचा :
‘ऑपरेशन सिंदूर’: दहशतवादी मसूद अझहर म्हणाला, मीही मेलो असतो तर बरे झाले असते!
‘आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताचे प्रत्युत्तर’
ऑपरेशन सिंदूर: दहशतवादाचा तळ नष्ट करण्यासाठी भारताने दिलेली प्रतिक्रिया; काय म्हणाले परराष्ट्र सचिव
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत काय म्हणाले?
दरम्यान, २ मे रोजी पाकिस्तानी बाजार २.५% ने सावरला होता, परंतु तज्ज्ञांच्या मते हा फक्त तात्पुरता दिलासा असू शकतो. याचा अर्थ असा की बाजारात काही काळ सुधारणा झाली आहे, पण ती टिकणार नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जोपर्यंत तणाव कमी होत नाही तोपर्यंत बाजारात सुधारणा होण्याची शक्यता फार कमी आहे.