काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी (३ जून) हातात संविधानाची प्रत घेऊन कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एका भव्य समारंभात त्यांनी राज्याचे सर्वोच्च पद स्वीकारले. शिवकुमार यांच्यासोबतच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री आणि इतर १२ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. यापूर्वी, काँग्रेस कर्नाटकात चार उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करू शकते, अशी चर्चा होती. परंतु पक्षाने जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी हातात संविधानाची प्रत घेऊन कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी बंगळूरू येथील लोक भवनातील ग्लास हाऊसमध्ये दुपारी ४:१० वाजता ७१ वर्षीय शिवकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. डी. के. शिवकुमार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या नेत्यांमध्ये सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांचाही समावेश आहे. या दोघांनाही डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये डी. के. शिवकुमार (मुख्यमंत्री), डॉ. जी. परमेश्वर (उपमुख्यमंत्री), के. एच. मुनियप्पा, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोली, कृष्णा बायरेगौडा, प्रियांक खर्गे, यू. टी. खादर, ईश्वर खंड्रे, यतींद्र सिद्धरामय्या, यार्थी सुरेश, शरण प्रकाश पाटील यांचा समावेश आहे.
डी. के. शिवकुमार यांनी पदग्रहण करण्यापूर्वी सोनिया गांधी यांनी फोनवरून त्यांचे अभिनंदन केले. काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने उधळली. या सोहळ्याला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षीय नेतेही उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यात उपस्थित असलेल्या सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले.
हे ही वाचा:
देशांतर्गत विमान कंपन्यांना १०,००० कोटींची मदत
परकीय चलन साठा वाचवण्यासाठी सोन्याची विक्री? सत्य काय?
अमेरिकेचा भारतासह ६० देशांवर नव्या शुल्काचा प्रस्ताव
वाळवीने पैसे खाल्ले! १ कोटींच्या नोटा फस्त
गेल्या काही वर्षांत, शिवकुमार हे काँग्रेसच्या सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक म्हणून उदयास आले असून, त्यांनी संकट व्यवस्थापन आणि संघटनात्मक कौशल्यांसाठी नावलौकिक मिळवला आहे. अनेक राजकीय संकटांच्या काळात पक्षाच्या हिताचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि ते दक्षिणेतील काँग्रेसच्या सर्वात मजबूत चेहऱ्यांपैकी एक राहिले आहेत.







