28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरराजकारणपब्लिक सब जानती है...देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीसांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘यह पब्लिक है सब जानती है’ असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेस पक्ष राजकारण सोडून जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?

ठाकरे सरकारचे मंत्री फक्त बोलतात, आणि भरडली जाते जनता

आता तरी कोकणवासींना पुन्हा निसर्गाच्या हवाली सोडू नका

सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा माफीनामा

देशात एकीकडे कोरोनाचे संकट सुरू असताना दुसरीकडे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून दररोज राजकारण रंगलेले दिसत आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून भारत सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सतत लक्ष्य केले जात आहे. पण दुसरीकडे काँग्रेस पक्ष सत्तेत असलेल्या महाराष्ट्र राज्याची कोरोना परिस्थिती देशात सर्वाधिक बिकट झालेली आहे. यावरूनच महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबत अवगत करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणतात,

गेल्या काही महिन्यांपासून आपण कोरोना महामारीचा मुकाबला करतोय. अशा स्थितीत देशाच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण आपण जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतो. तेव्हा महाराष्ट्राच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

आपले नाकर्तेपण लपवण्यासाठी मोदी सरकारवर टीका

जर आपण १३ मे पर्यंतची आकडेवारी पाहिली तर देशातील एकूण कोरोनाबाधीत लोकांपैकी २२ टक्के रुग्ण हे केवळ महाराष्ट्रातले आहेत. या आधी कित्येक महिने हा आकडा ३० टक्के इतका होता. आजवर कोरोनाच्या कारणाने झालेल्या मृत्यूंची आकडेवारी पाहिली, तर ३१ टक्क्यांच्या आसपास मृत्यू हे फक्त महाराष्ट्रात झालेले आहेत. जर सध्याच्या सक्रीय रुग्णांची संख्या पाहिली तर १४ टक्के रुग्ण हे केवळ महाराष्ट्रात आहेत. यावरून ही गोष्ट स्पष्ट होते आणि आम्हाला आशा आहे की ही गोष्ट तुम्हीही मान्य कराल, की जर महाराष्ट्राची स्थिती सुधारली तर देशात उपलब्ध असलेल्या सुविधांवरचा ताण कमी होईल आणि या संकटाचा मुकाबला आपण आणखीन प्रभावीपणे करू शकतो. आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार नाही. पण तरीही केंद्रातील मोदी सरकार पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभे आहे. केंद्र सरकारने देशभर जी मदत उपलब्ध केली यापैकी सर्वाधिक मदत ही महाराष्ट्राला दिली. १.८० कोटी व्हॅक्सिन दिली गेली. तर ८ लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. जर ऑक्सिजनचा विचार केला तर १७५० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आला. व्हेंटिलेटर, BiPAP, ऑक्सिजन कॉन्टॅक्टर याचाही मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात आला. तरीही आपले नाकर्तेपण लपवण्यासाठी बरेच नेता मोदी सरकारवर टीका करत असतात.

मृत्यू संख्या लपवणे हेच महाराष्ट्र मॉडेल आहे का?

राज्यातील सरकार आणि मीडियातील एक वर्ग फक्त मुंबईलाच संपूर्ण महाराष्ट्र समजण्याची चूक करतो. पण जर आपण मुंबईची ही परिस्थिती बघितली, तर इथे टेस्टिंग कमी करण्यात आले आहे. या कमी करण्यात आलेल्या टेस्टिंगमध्येही रॅपिड एंटीजन टेस्टचा समावेश खूप जास्त करून एक नवीन मॉडेल तयार करायचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवायचाही प्रयत्न केला जात आहे. ‘डेथ ड्यू टू अदर रीजन’ या श्रेणीत राज्यातील बाकीच्या जिल्ह्यांचे मिळून एकत्रितपणे ०.८ टक्के मृत्यू नोंदवले गेले आहेत, तर मुंबईत मात्र हे प्रमाण ४० टक्के इतके आहे. मृत्यु लपवण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत प्रतिवर्षी होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी अंदाजे ८८,००० इतकी आहे. पण २०२० मध्ये यात २०,७१९ ने वाढ झाली आहे. यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ही फक्त ११,११६ इतकी दाखवण्यात आली आहे. पण २०२० मध्ये ९६०३ इतके कोरोनाने झालेले मृत्यू हे लपवण्यात आले आहेत. यावर्षीही हेच सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू संख्या लपवणे हेच महाराष्ट्र मॉडेल आहे का? आजही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटिंग पिरेड आहे.

हे ही वाचा:

कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीचा फुगा फुटला

ग्रामीण महाराष्ट्र भगवान भरोसे

देशात रोज होणाऱ्या ४,००० मृत्यूंपैकी ८५० मृत्यू हे केवळ महाराष्ट्रातले आहेत. याचा अर्थ असा २२ टक्के मृत्यू हे केवळ महाराष्ट्रात नोंदवले जात आहेत आणि असे असून देखील सरकार आपली वाह वाह करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यांसारख्या अप्रगत क्षेत्रांना भगवान भरोसे सोडून दिले आहे. तिकडे कोणतीही मदत पुरवली जात नाहीये. ग्रामीण भागात ना हॉस्पिटल बेड उपलब्ध होत आहेत, ना उपचार. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी संघर्ष करावा लागत आहे. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांना हस्तक्षेप करून रेमडेसिवीर पुरवूपठ्या संदर्भात आदेश द्यावे लागत आहेत. महाराष्ट्रामध्ये याआधी एवढी भेदभावाची नीती कधीही पाहिली गेली नव्हती. ग्रामीण महाराष्ट्रात आज कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणारे मृत्यू तांडव सुरू आहे. रेमडेसिवीरच्या काळ्या बाजारात सरकारी रुग्णालयांचे डॉक्टर पकडले जात आहेत आणि त्यानंतर त्यांचा साधा पीसीआर सुद्धा मागितला जात नाही ही महाराष्ट्राची स्थिती आहे.

जनतेला मदत नाही, पण सोशल मीडियासाठी टेंडर

आजही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवला गेला आहे. अनेकदा संक्रमण कमी करण्यासाठी हा उपाय योग्य ठरतो, पण हे करताना गरीब शेतकरी आणि उपेक्षित वर्गाला सहाय्य करणे हे कोणत्याही सरकारचे कर्तव्य आहे. देशातली अनेक छोटी-मोठी राज्ये अशा प्रकारची मदत देताना दिसत आहेत. पण महाराष्ट्राने अजून पर्यंत कोणत्याही वर्गासाठी पॅकेज घोषित केलेले नाही. फक्त बजेटच्या आकडेवारीत फेरफार केली आहे. इथे सोशल मीडियाद्वारे सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी टेंडर पास केले जात आहेत. पण मदत कोणालाच केली जात नाही. एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे राज्यातील सरकार द्वारे ज्यात तुमचा काँग्रेस पक्षही सामील आहे कोणतीही मदत न मिळणे हा राज्यातील जनतेसाठी वेदनादायक अनुभव आहे.

ही वेळ जनतेसोबत उभे राहण्याची

हे सगळं होऊनही एका जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका आम्ही महाराष्ट्रात बजावत आहोत. आम्ही जाणतो की या संकटाच्या प्रसंगी सरकारला सल्ला देणे हे आमचे कर्तव्य आहे. पण हे करत असताना नकारात्मक वातावरण निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न होणेही गरजेचे आहे. फक्त टीका-टिपण्णी करून या संकटातून मार्ग निघू शकत नाही. केंद्र सरकारवर टीका करत असताना ज्या राज्यात तुमच्या पक्षाचे किंवा तुमच्या पक्षाच्या समर्थनाने निर्माण झालेले सरकार कार्यरत आहे, त्याबद्दलही तुमचे विचार व्यक्त करणे हे तुमचे कर्तव्य आहे. मला आशा आहे कि महाराष्ट्राची परिस्थिती तुमच्या समोर आली असेल. ही वेळ राजकारणाची अजिबात नाही. उलट जनतेसोबत एकत्रितपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. आमची अपेक्षा आहे की तुमच्या सरकारांनांही तुम्ही योग्य तो सल्ला द्याल.

राजकारण करून आणि नकारात्मकता पसरवून काहीही होणार नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सारे जग बघत आहे आणि त्याचे कौतुकही करत आहे. याच कारणाने आज सारे जग या महामारीत भारतासोबत उभे आहे आणि हरप्रकारे भारताला मदत करत आहे. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की भारतीय लसीला नाकारणारी तुमची काँग्रेस पार्टी आणि तुमचे मुख्यमंत्री आता लसीकरणाच्या मुद्द्यावरूनच राजकारण करत आहेत. परंतु भारत सरकारने लस निर्मितीच्या बाबतीत अभूतपूर्व सुरुवात केली आहे. मला आनंद आहे की पहिले विरोध करून सुद्धा आता तुमचा आणि तुमच्या पक्षाचा भारतीय लसीवरचा विश्वास वाढत आहे. मी अपेक्षा करतो की या संकट प्रसंगी तुमची पार्टी राजकारण सोडून जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका निभावेल. बाकी हे सर्वश्रुतच आहे की ‘यह पब्लिक है, ये सब जानती है’

देवेंद्र फडणवीस यांनी थेट सोनिया गांधींनाच पत्र लिहित महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारचे वस्त्रहरण केल्यामुळे आता राज्यात नवे राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळू शकतात. फडणवीसांच्या या पत्राला काँग्रेसकडून कशाप्रकारे उत्तर मिळते याकडे आता राज्याच्या नजरा आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा