पाकिस्तानने भारतावर मोठे हवाई केले. पण भारतीय सैन्याने हे हल्ले उधळून लावत प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराने आज (९ मे ) घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या हल्याची आणि भारताच्या प्रत्युत्तराची माहिती दिली. पाकिस्तानने ३६ ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे लष्कराने म्हटले. पाकिस्तानने ३००-४०० ड्रोनने हल्ला केला. हे ड्रोन तुर्कीमध्ये बनवले गेले होते. पाकिस्तानने भटिंडा एअर स्टेशनलाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात काही भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले आहेत. भारतीय प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याच वेळी, पाकिस्तानने नागरिकांना ढाल म्हणून वापरून हल्ला केल्याचेही लष्कराने सांगितले.
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, “७ आणि ८ मे च्या रात्री, पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण पश्चिम सीमेवर लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने अनेक वेळा भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले. इतकेच नाही तर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरही जड कॅलिबर तोफखाना आणि सशस्त्र ड्रोनचा वापर करून गोळीबार केला. ३६ ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न करण्यासाठी सुमारे ३०० ते ४०० ड्रोनचा वापर करण्यात आला. भारतीय सशस्त्र दलांनी यापैकी अनेक ड्रोन पाडले. ड्रोनच्या अवशेषांची फॉरेन्सिकली तपासणी केली जात आहे. सुरुवातीच्या अहवालांवरून असे दिसून येते की ते तुर्की ‘असिसगार्ड सोंगर ड्रोन’ आहेत.”
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “आपल्या कृती मान्य करण्याऐवजी, पाकिस्तानने असा हास्यास्पद आणि अपमानजनक दावा केला आहे की भारतीय सशस्त्र दल अमृतसरसारख्या त्यांच्याच शहरांना लक्ष्य करत आहेत.
त्यांच्या इतिहासा प्रमाणे ते अशा कृती करण्यात पटाईत आहे. भारताने ड्रोन हल्ल्याद्वारे नानक साहिब गुरुद्वाराला लक्ष्य केल्याची चुकीची माहिती पाकिस्तानने पसरवली आहे, जी आणखी एक उघड खोटी आहे. पाकिस्तान या परिस्थितीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे.”
हे ही वाचा :
विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या, “पाकिस्तानने ७ मे रोजी रात्री ८:३० वाजता विनाकारण ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला, जो अयशस्वी झाला. पाकिस्तानने नागरिकांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलेले नाही. पाकिस्तान प्रवासी विमानांचा ढाल म्हणून वापर करत आहे. भारतावर हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्य योग्य उत्तर देईल हे त्यांना चांगलेच माहीत आहे.
ड्रोन हल्ल्याच्या वेळेच्या फ्लाइट-ट्रॅकिंग डेटाच्या स्क्रीनशॉटचे प्रिंटआउट हातात धरून कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, भारताच्या बाजूचे हवाई क्षेत्र बंद घोषित केल्यामुळे नागरी हवाई वाहतूक बंद होती, परंतु नागरी विमान कंपन्या कराची आणि लाहोर दरम्यान उड्डाण करत होत्या. जे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ उड्डाण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांसाठी आणि इतर प्रवासी विमानांसाठी सुरक्षित नाही.