अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १०४ भारतीयांना डोनाल्ड ट्रम्प सरकारने नुकतेच हद्दपार केले होते. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे लष्करी विमान आणखी ११६ बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांच्या तुकडीला घेवून शनिवारी (१५ फेब्रुवारी) अमृतसरमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे, यामध्ये असे दोघे जण होते जे एका खून प्रकरणात भारतातून फरार होते. विमानातून उतरताच पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या. संदीप सिंग उर्फ सनी आणि प्रदीप सिंग अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघेही पटियाला जिल्ह्यातील राजपुरा येथील रहिवासी आहेत. दरम्यान, १५७ जणांची आणखी एक तुकडी आज (१६ फेब्रुवारी) अमृतसरमध्ये दाखल होणार आहे.
काल अमृतसरमध्ये उतरलेल्या भारतीय नागरिकांमध्ये पंजाबचे ६५, हरियानाचे ३३, गुजरातचे ८, उत्तर प्रदेशचे, महाराष्ट्र आणि राजस्थानचे दोन-दोन आणि हिमाचल, गोवा व जम्मू-काश्मीरचा प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश होता. त्याच प्रमाणे १५७ बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांची तिसरी तुकडी आज अमृतसरमध्ये दाखल होणार आहे. तत्पूर्वी, या संख्येमध्ये बदल होवू शकतो. कारण कालच्या दुसऱ्या तुकडीमध्ये ११६ जण होते, जे सुरवातीला ११९ इतके सांगण्यात आले होते.
हे ही वाचा :
मणिपूरमध्ये दोन दिवसात अकरा दहशतवाद्यांना अटक!
तिकीट विक्रीत अचानक झालेली वाढ हेच चेंगराचेंगरीचे कारण
‘खोया-पाया’ केंद्राची कमाल, महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या २० हजार भाविकांना आणले एकत्र!
ऑस्ट्रियामध्ये चाकू हल्ल्यात १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
दरम्यान, या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी (७ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली होती. ते म्हणाले, अमेरिकेने आणखी ४८७ भारतीय नागरिकांची ओळख पटवली आहे, जे तिथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. अमेरिका त्यांना लवकरच भारतात पाठवणार असून याबाबत भारताला कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.
परराष्ट्र सचिवांनी असेही सूचित केले की अधिक तपशील समोर येताच ही संख्या वाढू शकते. भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी भारत सरकार ट्रम्प प्रशासनाच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिकेने हद्दपार केलेल्या भारतीय नागरिकांवरील “अमानवीय वागणुकीच्या” मुद्द्यावर परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आणि भारत सरकार हा मुद्दा अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करेल, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले. दरम्यान, सुरवातीची १०४ आणि कालचे ११६ असे एकूण २२० भारतीय भारतात दाखल झाले आहेत.