दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल स्पष्ट होणार आहेत. अशातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध हरियाणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. दिल्लीतील पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी हरियाणा सरकारने यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला होता. यानंतर ज्येष्ठ वकील जगमोहन मनचंदा यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात हरियाणाच्या शाहबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणा न्यायालयाने केजरीवाल यांना याच वक्तव्याबद्दल समन्स बजावल्यानंतर आणि १७ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांच्या कायदेशीर अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने केजरीवाल यांना त्यांच्या दाव्यांना समर्थन देणारे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगानेही यापूर्वी केजरीवाल यांच्याकडून त्यांच्या दाव्यांसाठी पुरावे मागितले होते.
केजरीवाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या (BNS) कलम १९६(१) (शत्रूत्वाला प्रोत्साहन देणे), १९७(१) (भारताच्या एकतेला हानी पोहोचवू शकेल अशी खोटी माहिती पसरवणे), २४८(अ) (एखाद्याविरुद्ध खोटे आरोप करणे) आणि २९९ (धार्मिक श्रद्धांचा अपमान करण्यासाठी जाणूनबुजून केलेले कृत्य) अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.
वकील जगमोहन मनचंदा यांनी म्हटले आहे की, “दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा सरकारने यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याबद्दल केलेले वक्तव्य निराधार आहे. या विधानामुळे हरियाणाच्या कारभारावर जनतेमध्ये शंका तर निर्माण होणारच आहे पण या विधानामुळे सर्वसामान्यांमध्ये घबराट आणि अस्वस्थता वाढण्याचीही शक्यता आहे. यमुना नदी कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धेचे प्रतीक असून केजरीवाल यांच्या वक्तव्याने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.”
हे ही वाचा :
निवडणुकीपूर्वी दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून ५ लाख रुपये जप्त
युद्धग्रस्त पॅलेस्टिनी भूभाग असलेली गाझा पट्टी ताब्यात घेऊन विकास करणार!
दिल्लीच्या तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
मणिपूरमधून दहशतवादी संघटनांच्या सात सक्रिय सदस्यांना अटक
दरम्यान, २७ जानेवारी रोजी एका प्रचार सभेत अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजप दिल्लीतील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवू इच्छित आहे. हरियाणातून पाठवण्यात येणाऱ्या पाण्यात विष मिसळले जात आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता.