राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांच्या फोटोवर गाजराची माळ घालत “या सरकारने जनतेला फक्त गाजरं दिलीत”, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांना भाजपा महिला आमदार चित्रा यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे.
रोहिणीताई खडसे आज पत्रकार परिषदेत म्हणाल्या, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर महायुतीला या घोषणेचा विसर पडला आहे. उलट दादा तर एका कार्यक्रमात म्हणाले की कुणी दिले होते कर्जमाफीचे आश्वासन ? आज शेतकरी हवालदिल आहे, त्याला मदतीची गरज आहे. अशा परिस्थितीत जर सरकार दिलेला शब्द पुर्ण करत नसेल तर जनतेच्या मतांचा तो अपमान आहे.
सरकारने तुरीच्या हमीभाव ८ हजार रुपयांपर्यंत वाढवला. पण सरकारच्याच आयात धोरणामुळे बाजारात तूर अगदी ७ हजारांपेक्षाही कमी भावात विकावी लागत आहे. सोयाबीनला ६००० भाव देणार हे असे म्हटले होते. पण आज भाव ४५०० च्यावर जात नाही. हीच परिस्थिती कापसाची आहे, मक्याची आहे आणि इतर पिकांची आहे असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीवर हे सरकार आळा घालणारे होते. पण आज खतांच्या बॅग, बी बियाणे, शेतीचे साहित्य सर्व गोष्टी महाग झाल्या आहेत. सरकारने मात्र त्यांना काही दिलासा दिला नाही. महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास महिलांना लाडकी बहिण योजनेंतर्गत २१०० महिना देणार. कुठंय ते २१०० ? उलट सरकारमधील एक मंत्री म्हणतात २१०० रुपये देऊ असे कुणीही म्हटले नव्हते मग मंत्री महोदय हे काय आहे ? या सरकारवर ४२० गुन्हा दाखल होऊ शकतो, यांनी फसवणूक करून महिलांची मते मिळवली आहेत.
हे ही वाचा :
RAW च्या प्रमुखपदी आयपीएस पराग जैन!
पाकिस्तानात लष्करी ताफ्यावर आत्मघातकी हल्ला, १३ सैनिक ठार, १० जखमी!
“समाजवाद” आणि “धर्मनिरपेक्ष” हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत असावेत का ?
सुंदर दिसण्यासाठी घेत होती औषधे, ‘काँटा लगा’ फेम शेफाली जरीवालाचा मृत्यू!
दरम्यान, रोहिणीताई खडसे यांच्या टीकेवर आमदार चित्रा वाघ यांनी प्रत्युतर देत टीका केली आहे. ट्वीटकरत त्या म्हणाल्या, तुतारीची झाली पुंगी आणि त्यांच्या तडतड वाजंत्र्यांच्या बाताच ढोंगी. गाजरांचा हार घालून सरकारची थट्टा करणाऱ्यांनी आधी स्वतःचा ‘काळा इतिहास’ बघावा. लोकसभा निवडणुकीत ८ हजार रुपयांची गाजरं दाखवणारे हे आज आमच्या नेत्यांना गाजराचे हार घालत आहेत…?, असा त्यांनी उपस्थित केला.
त्या पुढे म्हणाल्या, लक्षात ठेवा हे सरकार आश्वासनं देत नाही तर प्रत्यक्ष काम करतं. आणि हो, ‘गाजरांचा हार’ घालणाऱ्यांनी लक्षात घ्यावं, जनता आता गाजर दाखवणाऱ्यांवर नाही, गाजर उगवणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्यांवर विश्वास ठेवते. तुतारीच्या वाजंत्र्यांनी हे लक्षात घ्यावं, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
तुतारीची झाली पुंगी..
आणि त्यांच्या तडतड वाजंत्र्यांच्या बाताच ढोंगी…गाजरांचा हार घालून सरकारची थट्टा करणाऱ्यांनी आधी स्वतःचा ‘काळा इतिहास’ बघावा..!
लोकसभा निवडणुकीत ८ हजार रुपयांची गाजरं दाखवणारे हे…
आज आमच्या नेत्यांना गाजराचे हार घालत आहेत…?लक्षात ठेवा हे सरकार…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 28, 2025
