लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन आज विधान भवन, मुंबई येथे संपन्न झाले. संसदीय अंदाज समितीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र भूमीत देशभरातील विधानमंडळाच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष व सदस्य यांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. मी या कार्यक्रमाला केवळ राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उपस्थित नाही, तर राज्याच्या अंदाज समितीवर सहा वर्षे काम केलेल्या एका सदस्याच्या भूमिकेतूनही उपस्थित आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आपल्या संविधानाच्या रचनेनुसार, विधिमंडळाच्या समित्यांना सभागृहांपेक्षा अधिक प्रभावी मानले जाते, कारण या समित्या केवळ अधिवेशनाच्या मर्यादित कालावधीत कार्यरत राहत नाहीत, तर वर्षभर प्रशासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवतात. या समित्यांच्या कार्यप्रणालीमुळे संसद आणि राज्य विधिमंडळांना सरकारला उत्तरदायित्वाच्या चौकटीत ठेवणे शक्य होते. परिणामी, लोकशाही अधिक सुदृढ आणि पारदर्शक बनते. अतिशय वैज्ञानिक पद्धतीने अर्थसंकल्पातील खर्चांच्या अंदाजाचे नियोजन या समितीच्या माध्यमातून केले जाते, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
मुख्याध्यापक वडिलांनी दिली मुलीला ‘जीवघेणी शिक्षा’
बुमराह म्हणजे टीम इंडियाचा खरी ‘संपत्ती’, त्याला माहीतय विकेट कशा काढायच्या!
भारताचा सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज बुमराहच!
अंदाज समितीमुळे राज्य शासनाच्या सर्व विभागांची जबाबदारी निश्चित होते, जे अत्यंत महत्वाचे आहे. केवळ जबाबदारीच नाही, तर सरकारद्वारे खर्च करण्यात येणारा निधी राज्य शासनाच्या धोरणांनुसार आहे की नाही, हेही अंदाज समितीच्या माध्यमातून स्पष्ट होते. त्यामुळेच लोकशाही व्यवस्थेत संसदीय समित्यांचे अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे. अंदाज समितीच्या माध्यमातून प्रशासनावरही आवश्यक ती नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
