गेले दीड वर्षे आपण कोरोनापासून लढा देत आहोत. या कोरोना काळातही अनेक शाळांनी भरसमाठ वाढवलेली फी आकारणी हा डोकेदुखीचा विषय झालेला आहे. गतवर्षीपासून शाळांची शुल्कवाढ या विषयाने पालकांचे जिणे अक्षरशः हराम केले आहे. ठाणे जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडे २३ शाळांच्या ३१ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. असे असले तरी, या तक्रारींवर मात्र अद्यापही कोणतीच कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे.
शाळा आणि पालकांमध्ये शुल्कवाढीवरून गेले काही दिवस मोठ्या प्रमाणावर वाद सुरू आहेत. त्यामुळेच याबाबत आता हे प्रकरण न्यायालयाच्या मार्फत सुनावणी दरम्यान आहे. शाळांचा मनमानी कारभार असल्याचे वारंवार पालकांकडून म्हटले गेल्यामुळे आता न्यायालयानेही शाळांना तसेच सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
हे ही वाचा:
मृतांच्या नातेवाईकांना किमान दहा लाख रुपयांची मदत द्या
हँग झालेल्या वेबसाईटचीही आता चौकशी होणार
हा तर महापालिकेचा निष्काळजीपणा!
जय हो! लडाखमध्ये चार नवे विमानतळ आणि ३७ हेलिपॅड
कोरोनाच्या काळात अनेक शाळांना शाळा सुरू नसताना केलेली शुल्कवाढ ही पालकांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. अनेक पालकांचे टाळेबंदीमध्ये रोजगार गेले, त्यामुळेच आता फी कशी भरणार हाच प्रश्न उभा राहिलेला आहे. मुख्य म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार देण्यात येणारे प्रवेशही शाळांनी रोखले आहेत. त्यामुळे शाळांच्या एकूणच मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उभे आहे.
शाळांनी केलेल्या शुल्कवाढीमुळे पालकांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. टाळेबंदीमध्ये हातातले काम गेले, त्यात हा फी शुल्कवाढीचा जाच. खासगी शाळांकडून पालकांना शुल्क भरण्यास कोणत्याही प्रकारची सवलतही दिली जात नाही. तसेच अनेक शाळांनी सहा महिन्यांचे शुल्क एकाच वेळी भरण्याची सक्ती केलेली आहे. शाळांच्या याच मनमानी कारभारावर आता ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच नवी मुंबईमधून २३ शाळांच्या विरोधात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. शिक्षण विभागाकडे दाखल झालेल्या या तक्रारीची संख्या ३१ आहे अशी माहिती देण्यात आली.