भारताने ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकविला त्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी जाण्याची चिन्हे नाहीत. पण भारताचे लेफ्टनंट जनरल सुमेर आयव्हन डीकुन्हा म्हणाले की, संपूर्ण पाकिस्तान आमच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आहे, हे त्यांनी विसरू नये. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारताची शस्त्रसज्जता आणि पाकिस्तानची खुमखुमी त्वरित कशी उतरविली जाईल, याचा उल्लेख केला.
ले. जनरल डिकुन्हा म्हणाले की, “पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय रावळपिंडीहून कुठेही हलवले गेले,अगदी खैबर पख्तूनख्वात जरी नेले तरीही ते आमच्या क्षेपणास्त्र टप्प्यातच राहील. त्यांनी लपण्यासाठी खूप खोल जागा शोधावी लागेल. ले. जनरल डिकुन्हा यांनी यावेळी शिशुपाल सिद्धांताची मांडणी केली. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाचे १०० अपराध झाल्यानंतर त्याचा शिरच्छेद केला होता. त्याप्रमाणे हा सिद्धांत युद्धातही महत्त्वाचा असतो, असे डिकुन्हा म्हणतात. ते सांगतात, “शिशुपाल सिद्धांत” म्हणजे संयम ठेवणे — जोपर्यंत धोका एका ठराविक मर्यादेपर्यंत पोहोचत नाही, आणि एकदा ती मर्यादा त्याने ओलांडली, की निर्णायक आणि धडाडीची कारवाई करणे, म्हणजेच शिशुपाल सिद्धांत. शिशुपालाचे १०० अपराध होईपर्यंत त्याला अभय मिळाले पण ती अपराधांची मर्यादा त्याने ओलांडल्यावर त्याचा वध करण्यात आला.
भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पाकिस्तानमधील अनेक महत्त्वाच्या हवाई तळांवर लॉइटरिंग म्युनिशन्स आणि गाईडेड वेपन्स वापरून अचूक आणि धोकादायक लक्ष्ये नष्ट केली. लांब पल्ल्याचे ड्रोन, अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि एकात्मिक कमांड स्ट्रक्चरमुळे भारताच्या तीनही दलांमध्ये समन्वय साधता आला आणि ऑपरेशन यशस्वी झाले.
हे ही वाचा:
राजधानी एक्स्प्रेसला घातपात करण्याचा होता कट
छगन भुजबळ मंत्री होणार, आज शपथविधी
‘ऑपरेशन सिंदूर’ मदरशांच्या अभ्यासक्रमात शिकवले जाणार
स्टार हाऊसिंग फायनान्स लि.ची झेप आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजकडे
पाकिस्तानने त्यावेळी ८००-१००० ड्रोन पाठवले, जे नागरिकांच्या दिशेने होते, परंतु सर्व शस्त्रयुक्त ड्रोन भारतीय सुरक्षा दलांनी नष्ट केले, त्यामुळे कोणतीही नागरी जीवितहानी झाली नाही.
डिकुन्हा म्हणाले की, आमचे काम म्हणजे राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि जनतेचे संरक्षण. आम्ही केवळ सैनिकांना नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांनाही सुरक्षिततेचा विश्वास दिला. त्यामुळे संपूर्ण भारताला अभिमान वाटतो — हेच ऑपरेशन सिंदूरचे यश आहे.”
ऑपरेशन सिंदूरने भारताच्या “रिऍक्टिव्ह” संरक्षण धोरणातून “प्रो-ऍक्टिव्ह” सुरक्षा धोरणात रूपांतर झाल्याचे स्पष्ट केले.
