स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथाचा संदर्भ देत “सातवे सोनेरी पान लिहिण्याचे काम सुरू आहे,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे लिखित ‘राष्ट्रभाव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
मिहाना पब्लिकेशन्स, पुणे यांच्या वतीने गुरुवार, १६ एप्रिल रोजी दादर येथील वसंत स्मृती सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याला विशेष रंग चढला.
रवींद्र साठे लिखित ‘राष्ट्रभाव’ हा ग्रंथ त्यांच्या विविध लेखांचा संकलित आविष्कार असून तो भारतीय राष्ट्रवाद, संस्कृती आणि वैचारिक परंपरेवर आधारित आहे. पाश्चिमात्य आणि भारतीय राष्ट्रवादातील भेद त्यांनी उदाहरणांसह स्पष्टपणे मांडला आहे.
यावेळी विशेष अतिथी म्हणून मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अमित साटम आणि आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.
भैय्याजी जोशी यांनी ‘राष्ट्रभाव’ या ग्रंथातील आशय, तसेच त्याचे सामाजिक व वैचारिक महत्त्व यावर सखोल भाष्य केले. आपल्या मनोगतात त्यांनी पुस्तकातील वैशिष्ट्यपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकत अशा प्रकारच्या साहित्यनिर्मितीची आजच्या काळातील आवश्यकता अधोरेखित केली आणि लेखकाच्या प्रयत्नांचे कौतुकही केले.
हे ही वाचा:
व्ही. ई.एस. लॉ कॉलेजची यशस्वी सुरुवात
मुंबईच्या नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्स आणि चोरीचा थरार
नेस्कोतील रेव पार्टीच्या संदर्भात टेक्नो ग्रुपवर कारवाई हवी
जैशची महिला शाखा देशात सक्रीय आहे का?
विशेष अतिथी आमदार अतुल भातखळकर यांनी ‘राष्ट्रभाव’ या पुस्तकाचे कौतुक करताना सांगितले की, राष्ट्रवादासारख्या व्यापक विषयाला लेखमालेतून आणि एका ग्रंथात प्रभावीपणे मांडणे हे मोठे आव्हान होते, जे रवींद्र साठे यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने पार पाडले आहे. या पुस्तकात भारतीय आणि पाश्चिमात्य राष्ट्रवादातील भेद स्पष्ट करण्यात आला असून, भारतीय राष्ट्रवाद हा संस्कृती आणि विचारांवर आधारलेला असल्याचे अधोरेखित केले आहे. ‘ज्ञानयुक्त कर्म’ या सावरकरांच्या विचारांचा प्रभावही या लिखाणातून दिसून येतो. तसेच राष्ट्र ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून एक जिवंत भाव आहे, ही भूमिका मांडण्यात आली आहे. सामाजिक राष्ट्रवाद, सावरकर आणि आंबेडकर यांच्या विचारांचे संदर्भ, तसेच स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्रवादाच्या बदलत्या स्वरूपावरही पुस्तकात भाष्य करण्यात आले आहे.







