भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी ही माहिती दिली. राजीनाम्यानंतर अण्णामलाई हे आता कोणती मोठी राजकीय घोषणा करणार किंवा निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे.
राजीनामा स्वीकारला जाण्यापूर्वी अण्णामलाई यांनी दिल्ली दौरा केला होता. यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेऊन आपल्या राजकीय भविष्यासंदर्भातील योजनांवर चर्चा केली होती. या भेटींनंतर भाजप त्यांची समजूत काढून त्यांना पक्षात कायम ठेवेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र तसे घडले नाही. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष त्यांच्या आगामी भूमिकेकडे लागले आहे.
हे ही वाचा:
आरबीआयकडून रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम
भारताला एसयू-५७ स्टेल्थ फायटरच्या संयुक्त निर्मितीचा रशियाकडून प्रस्ताव
राजनैतिक मार्गाने किंवा लष्करी कारवाईतून, विजय अमेरिकेचाच!
एका वर्षासाठी पाठवलेले यान ११ वर्षे कार्यरत; ‘मेवेन’ मोहिमेचा प्रवास अखेर संपला
भारतीय पोलीस सेवेचे (IPS) माजी अधिकारी असलेले अण्णामलाई २०२० मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते. अल्पावधीतच ते तमिळनाडूमधील पक्षाचे प्रमुख चेहरे बनले. २०२१ ते २०२५ या कालावधीत प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक राज्यव्यापी मोहिमांचे नेतृत्व केले आणि युवक तसेच सोशल मीडियावरील समर्थकांमध्ये मजबूत जनाधार निर्माण केला. २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांनंतर त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले. पक्षातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक असूनही त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. राजकीय विश्लेषकांच्या मते, अन्नामलाई स्वतंत्र राजकीय वाटचाल करण्याच्या दिशेने ठामपणे वाटचाल करताना दिसत आहेत. दरम्यान, ते नवीन राजकीय पक्ष स्थापन करू शकतात, अशा चर्चांनाही वेग आला आहे.







